Information Hub

Archive for the ‘Uncategorized’ Category

खरच मी लढणार
माणसातल्या राक्षसाला माणुसकी शिकवणार .

खरच मी लढणार..

सत्तेतल्या गुंडाबरोबर.
आया बहीणींवर अत्याचार करणार्‍या जनावरांबरोबर.

जनतेचे सेवक असताना त्यांचेच भक्षक होऊन
रक्तपिपासु गिधाड झालेल्या नोकरशहांबरोबर.

रुग्ण बरा होण्या ऐवजी
त्याच्या कडुन पैसे लुटणार्‍या डॉक्टररुपी दरवडेखोरांबरोबर.

भर रस्त्यात एका निरपराध मुलीवर वासनांध प्रेमापोटी चाकुचे वार करणार्‍या नराधमाबरोबर
आणि त्या मुलीच्या वाचवा वाचवा अश्या किंकाळ्या ऐकुनही मदतीस न जाणार्‍या षंढ समाजाबरोबर .

संपाच्या नावावर जनतेस वेठीस धरणार्‍या
कामगार संघटनेंच्या नेत्यांबरोबर.

प्रवाश्यांच्या आगतिकतेचा फायदा उचलुन
भरमसाठ भाडे आकारणार्‍या रिक्षा वाल्यांबरोबर

स्वताच्या भारत मातेच रक्षण करण्या ऐवजी
लाचरुपी हत्याराने तिला पोखरणार्‍या हुकुमशहांबरोबर

खरच मी लढ लढ लढणार
लढताना मरण तर राहुद्याच पण जिंकुनच येणार.

माणसातल्या राक्षसाला नक्कीच माणुसकी शिकवणार
त्याला माणसातला देव बनवणार
त्याला माणसातला देव बनवणार .

 

खरच म…

तू तेव्हा तशी…

तू तेव्हा अशी…

तू माझ्या आयुष्याची पहाट॥

तू माझ्या कॆफ़ाची मत्त लाट..

तू मागील जन्मांची आर्त साद..

तू मानसकुंजातील वेणू नाद..

तू माझ्या एकांताचा प्रकाश..

तू माझ्या गीतांचा बाहुपाश..

तू माझ्या दु:खाची चांदरात..

तू माझ्या स्वप्नांचा पारिजात..

तू अम्रुतभासांचा अंग राग..

तू विझल्या नयनांचा दीप राग..

तू माझ्या जगण्याची वाटचाल..

तू माझ्या रक्ताचा रंग लाल..

तू माझ्या असण्याचा अंश अंश..

तू माझ्या नसण्याचा मधुर दंश..

देवा, ह्याही देशात पाऊस पाड

जिथे पाण्याला येतो खुनाचा वास

जिथे हिंसेच्या मळ्यात पिकतो ऊस किंवा ताग

देवा, जिथे तू आहेस तोवर निषिद्ध आहे वैताग

 देवा, ह्याही देशात पाऊस पाड

जिथे माणसांचं ख़त घालून समाज उगवतात

जिथे बळी जाणारे तुझ्यावर विश्वास ठेवतात

आणि बळी घेणारे तुझेच अवतार असतात

 देवा, ह्याही देशात पाऊस पाड

जिथे दुष्काळही नशिबं फळवून जातात

जिथे माणुसकीची यंत्र अखंड चालू असतात

जिथे परोपकाराचा ओव्हरटाईम सदैव चालतो

 देवा, ह्याही देशात पाऊस पाड

कारण इथे भरपूर खाणारे गाणी गातात

आणि ऊपाशी मरणारे त्यांना साथ करतात

जिथे दुश्काळ आणि सुकाळ एकत्र नांदतात

 देवा, ह्याही देशात पाऊस पाड

अरे खोप्यामधी खोपा

अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाला टांगला

पिलं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला

खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखरांची कारागिरी
जरा देख रे मानसा

तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं

कवयित्री – संत बहिणाबाई चौधरी

माझ्या मराठीची गोडी
मला वाटते अवीट,
माझ्या मराठीचा छंद
मना नित्य मोहवित.

ज्ञानोबांची तुकयाची
मुक्तेशाची जनाईची,
माझी मराठी गोडी
रामदास शिवाजीची.

‘या रे, या रे अवघे जण,
हाक मायमराठीची,
बंध खळाळा गळाले
साक्ष भीमेच्या पाण्याची.

डफ तुणतुणे घेऊन
उभी शाहीर मंडळी,
मुजर्‍याची मानकरी
वीरांची ही मायबोली.

नांगराचा चाले फाळ
अभंगाच्या तालावर,
कोवळीक विसावली
पहाटेच्या जात्यावर.

हिचे स्वरूप देखणे
हिची चाल तडफेची,
हिच्या नेत्री प्रभा दाटे
सात्विकाची, कांचनाची.

कृष्णा गोदा सिंधुजळ
हिची वाढवती कांती,
आचार्यांचे आशिर्वाद
हिच्या मुखी वेद होती.

माझ्या मराठीची थोरी
नित्य नवे रुप दावी,
अवनत होई माथा
मुखी उमटते ओवी.

कवी – वि. म. कुलकर्णी.

सदैव सैनिका, पुढेच जायचे
न मागुती तुवा, कधी फिरायचे

सदा तुझ्यापुढे, उभी असे निशा
सदैव काजळी, दिसायच्या दिशा
मधून मेघ हे, नभास ग्रासती
मधेच या विजा, भयाण हासती
दहा दिशांतुनी, तुफान व्हायचे

प्रलोभने तुला, न लोभ दाविती
न मोहबंधने, पदांस बांधिती
विरोध क्रोध वा, तुला न थांबवी
न मोह भासतो, गजांत वैभवी
न दैन्यही तुझे, कधी सरायचे

कवी – वसंत बापट

अनामवीरा, जिथे जाहला तुझा जीवनांत
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात

धगधगता समराच्या ज्वाला या देशासाठी
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव

जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान
सफल जाहले तुझेच हे रे तुझे बलिदान

काळोखातूनी विजयाचा हे पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्यूंजय वीरा

कवी – कुसुमाग्रज

गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा नुसतीच काडी;
म्हणायचा अन मनाशीच की
या जागेवर बांधिन माडी;

मिचकावुनि मग उजवा डोळा
आणि उडवुनी डावी भूवयी,
भिरकावुनि ती तशीच द्यायचा
लकेर बेचव जैसा गवयी.

गिर्‍हाईकाची कदर राखणे;
जिरे, धणे अन धान्यें गळित,
खोबरेल अन तेल तिळीचे
विकून बसणे हिशेब कोळित;

स्वप्नांवरती धूर सांडणे
क्वचित बिडीचा वा पणतीचा
मिणमिण जळत्या; आणि लेटणे
वाचित गाथा श्रीतुकयाचा.

गोणपटावर विटकररंगी
सतरंजी अन उशास पोते;
आडोशाला वास तुपाचा;
असे झोपणे माहित होते.

काडे गणपत वाण्याने ज्या
हाडांची ही ऐशी केली
दुकानातल्या जमीनीस ती
सदैव रुतली आणिक रुतली.

काड्या गणपत वाण्याने ज्या
चावुनि चावुनि फेकुन दिधल्या,
दुकानांतल्या जमीनीस त्या
सदैव रुतल्या आणिक रुतल्या.

गणपत वाणी बिडी बापडा
पितांपितांना मरून गेला;
एक मागता डोळे दोन
देव देतसे जन्मांधाला!

कवी – बा.सी.मर्ढेकर

 
 
सकाळ वृत्तसेवा
Thursday, December 10, 2009 AT 09:23 AM (IST)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना “सकाळ’चे कार्यकारी संपादक वसंत भोसले यांनी अनावृत पत्र (५ नोव्हेंबर) लिहून शेट्टी यांची राजकारणातील बदलती भूमिका, संघटनेची वाटचाल आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न यावर चर्चा घडवून आणली.

या पत्राला आणि एकूणच त्यावरील चर्चेला राजू शेट्टी यांनी दिलेले उत्तर येथे देत आहोत.

प्रिय मित्र वसंत भोसले,
कार्यकारी संपादक,
दै. “सकाळ’, कोल्हापूर.
स.न.वि.वि.

ता. ५ नोव्हेंबरच्या दै. “सकाळ’मध्ये तुम्ही मला लिहिलेले अनावृत पत्र वाचले. त्याचे शीर्षकच होते, “राजू शेट्टी… पैरा फेडता फेडता तुमचं शेत नांगरायचं राहून गेलं!'”पैरा फेडणे’ हा शब्दप्रयोग मी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मारकाजवळ येडेमच्छिंद्र येथे लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्या दिवशी, १७ मे २००९ रोजी विजयी सभेत केला होता. ज्या ज्या लोकांनी लोकसभेच्या निवडणुकीत मला मदत केलेली आहे, त्यांचा पैरा माझ्यावर चढलेला आहे आणि मी शेतकरी असल्यामुळे पैरा फेडणे हे माझे कर्तव्य आहे, असे मी म्हटले होते. पण नंतर पैरा फेडणे याचा अर्थ कोणी, कसाही घेऊ लागला म्हणून मला हे स्पष्ट करावे लागले. असो.

तुम्ही पत्रामध्ये उपस्थित केलेले मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. शेतकऱ्यांच्या संघटिताबद्दल अनेक अनुत्तरित प्रश्‍नांचा ऊहापोह आपण या पत्रामध्ये केला आहे. उदारहरणार्थ – पाण्यापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांचे दूध का विकावे? साखरेचे वाढलेले भाव लोकांना दिसतात; पण ज्या उसापासून ती साखर तयार होते, त्या उसाचा उत्पादन खर्च किती? हातात पैसे पडतात किती? ज्या कापसापासून कापड तयार होते तो कापूस उत्पादक शेतकरी अर्धनग्न का? ज्वारी आणि भात उत्पादन करणारा शेतकरी अर्धपोटी का? शेतकऱ्यांच्या घरात जन्माला आलेल्या आणि ग्रामीण संस्कृतीत वाढलेल्या शेतकऱ्यांच्या पोरी शेतकरी नवरा नको, असे का म्हणतात? असे अनुत्तरित प्रश्‍न माझ्या मनात निर्माण झाले होते. त्याचा शोध घेत घेत मी पहिल्यांदा चळवळीत आलो आणि चळवळ करता करता लक्षात आले, की राज्यकर्त्यांनी राबविलेल्या शेतकरी धोरणाला विरोध करायचे व शेतकरीहिताचे धोरण राबविण्यासाठी जनआंदोलनाच्या रेट्याच्या माध्यमातून चळवळ करावयाची असते. कधी कधी लोकांचा क्षोभ इतका हिंसक असतो, की लोक हिंसक बनतात, कायदा हातात घेतात आणि त्याचा फटका चळवळीशी संबंध नसणाऱ्या जनतेला बसत असतो. काही वेळा आर्थिक नुकसान होऊन सामाजिक अशांतताही त्यामुळे निर्माण होते.

हे सर्व कशासाठी? तर शेतकरीविरोधी धोरण बदलण्यासाठी; पण लोकशाही राज्यात लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी धोरणे राबवित असतात. मग बहुसंख्य मतदार शेतीशी संबंधित असताना शेतकरीविरोधी धोरणे राबविली जातात कशी? याचा शोध घेत घेत मी चळवळी करता करता राजकारणापर्यंत येऊन पोचलो. निवडणूक ही सुद्धा चळवळ म्हणून लढविणे हा हेतू होता. मतपेटीला राज्यकर्त्यांबद्दल जनतेची नाराजी दाखवून देणे हा त्यामागचा उद्देश होता.

तसं बघायला गेलं तर तुम्ही मला अनेक वर्षांपासून ओळखता. १९९० च्या दशकातला नुकताच मिशरूड फुटलेला महाविद्यालयात शिकणारा सांगलीच्या परिवर्तन ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला सतत भेटणारा चळवळ्या राजू ते आजचा खासदार राजू शेट्टी इथंपर्यंतच्या प्रवासाचे आपण एक साक्षीदार आहात.राजकारणाबद्दल व राजकारण्यांबद्दल तुमच्याइतकाच मलाही तिटकारा होता, हे आपल्याला माहीत आहेच; पण शेतकऱ्यांच्या समस्यांच्या उगमांचा शोध घेत घेत माझा प्रवास राजकारणापर्यंत येऊन पोचला. एकदा राजकारणामध्ये उतरल्यानंतर नको असलेल्या करारावर काही वेळी नाईलाजाने सह्या कराव्या लागतात. आपल्याला माहीत आहेच, की शेतकऱ्यांचा प्रश्‍न हाताळताना व्यवहार व अंतिम ध्येय यांची सांगड घालूनच चळवळी केल्या. कोणत्याही इझममध्ये न अडकता शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यावर भर दिला; पण त्यामुळे इतरांच्या मानाने माझ्या यशाची कमान चढती राहिली, हे कोणीही नाकबूल करणार नाही. आपण लिहिलेल्या पत्रावर चार दिवस (दि.१३, १४, १६ व १७ नोव्हेंबरच्या “सकाळ’मध्ये) निवडक प्रतिक्रिया प्रसिद्ध केल्या. मी त्या प्रतिक्रियांचा अभ्यास केला. बहुतेक प्रतिक्रिया या शेतीतून बाहेर पडलेल्या व सुरक्षित जीवन जगणाऱ्या बुद्धिवाद्यांच्या तसेच सुशिक्षितांच्या होत्या. शेतकऱ्यांच्या फारच कमी होत्या. मला शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया अपेक्षित होत्या; पण आपल्या मनातले विचार सूत्रबद्धपणे मांडता न आल्याने किंवा कामाच्या रामरगाड्यातून सवड न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या नसाव्यात. मला स्वतःला बरेच दूरध्वनी मात्र आले. आलेल्या प्रतिक्रियांपैकी माझा खरा चेहरा आता उघड झाला, असे मत व्यक्त केले, तर काहींनी सारे राजकारणी एकाच माळेचे मणी अशी उपहासात्मक प्रतिक्रिया नोंदवली. बहुतांश लोकांनी चळवळ टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, अशा भावना व्यक्त केल्या. आपण न प्रसिध्द केलेल्या प्रतिक्रिया कशा होत्या, हे मला मात्र माहीत नाही.

अनेकांचा रोष होता तो रिडालोसच्या आघाडीबाबत; पण ही आघाडी करत असताना महाराष्ट्रातील कामगार चळवळी, ग्राहक चळवळी, विद्यार्थी, दलित, सामाजिक व काही अंशी शेतकरी चळवळीसुद्धा थंडावत चाललेल्या आहेत नि सामान्य माणूस हतबल झालेला आहे. एका बाजूला महागाईचा भस्मासूर आ वासून त्यांच्या समोर उभे असताना व सर्वसामान्यांच्या मुलाबाळाला शिक्षणाची संधी मिळत नसताना व बेरोजगाराचे तांडे निर्माण झालेले असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या, भारनियमनामुळे अंधाराच्या खाईत लोटला गेलेला ग्रामीण महाराष्ट्र या प्रश्‍नांवरून जनसामान्यांच्या चळवळीने महाराष्ट्र ढवळून निघाला पाहिजे होता. पण धंदेवाईक राजकारण्यांचा सद्यःस्थितीला महाराष्ट्र शांतच आहे. सामान्य माणसाच्या चळवळीच्या माध्यमातून प्रश्‍न सोडवून घेण्याऐवजी सुपारी देऊन प्रश्‍न सोडवून घेण्याकडे कल वाढत चाललेला आहे. ही गोष्ट पुरोगामी महाराष्ट्राला लज्जास्पद अशीच आहे. अशा परिस्थितीमध्ये चळवळ करणाऱ्या घटकांना एकत्रित करून एक आशादायी पर्याय निर्माण करण्याचा रिडालोसच्या माध्यमातून प्रयत्न केला. पण रिडालोसच्या आम्ही नेत्यांनी केलेल्या पोरकटपणामुळे जनतेचा विश्‍वास संपादन करू शकलो नाही, हे मी प्रांजळपणे कबूल करतो.

शिवेसना-भाजप युतीला स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाने कधीही पाठिंबा दिलेला नव्हता; पण गोबेल्सनीतीचा वापर करून शिवसेना नेते मात्र वारंवार त्याचा पुनरुच्चार करत होते व बातम्या छापून आणत होते. आमचा खुलासा मात्र कुठेतरी कोपऱ्यात छापून यायचा. नंतर तो क्षणिक होत गेला. कॉंग्रेसच्या एका उमेदवाराला मी मदत केली. ते साखरसम्राटांना विरोध करण्याच्या नादात माझ्याच काही सहकाऱ्यांच्या आग्रहास्तव बळी पडलो. पण ही गोष्ट माझ्या अनेक शेतकऱ्यांना व सहकाऱ्यांना रुचलेली नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रत्यक्षात निवडणुकीच्या राजकारणामध्ये उतरावे किंवा नाही, याबाबतीत भिन्न मतप्रवाह यानिमित्ताने बघावयास मिळाले. दोन्ही बाजूंची भूमिका ही प्रामाणिक होती. ती म्हणजे चळवळीची ताकद वाढली पाहिजे. मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. १९९२ ते २००१ अशी ९ वर्षे मी चळवळीत सक्रिय राहिलो. २००१ मध्ये जिल्हा परिषद, २००४ मध्ये विधानसभा, २००९ मध्ये लोकसभा अशा निवडणुका लढवल्या व जिंकल्या; पण चळवळीतल्या पहिल्या ९ वर्षांच्या टप्प्यात माझ्या हाताला फारसे यश लागले नाही. लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा चळवळीत उतरू लागलो, तशी चळवळीची ताकद क्रमशः वाढू लागली. लोकप्रतिनिधी असल्याचा फायदा काय होता आणि त्यामुळे चळवळीत रस्त्यावरची लढाई लढत राहिलो. नंतर नियम १०१ खाली विधानसभेत चर्चा घडवून आणली व सर्वपक्षीय आमदारांचा दबावगट तयार करून सरकारला दूध दरवाढीच्या संदर्भात निर्णय घेण्यास भाग पाडून दूध दरवाढ पदरात पाडून घेतली. इथे रस्त्यावरच्या व सभागृहातील लढाया एकमेकांना पूरक ठरल्या. तसेच लोकसभेतसुद्धा ऊस दराच्या प्रश्‍नावर तेलगू देसम, समाजवादी पक्ष यांच्यासह सर्व पक्षांच्या खासदारांना एकत्र करण्यात यश मिळवले. मी किंवा चळवळीत संबंधित लोकप्रतिनिधी आमच्याकडे उपलब्ध नसता तर इतक्‍या प्रभावीपणे आम्हाला काम करता आले नसते. आम्ही राजकारणाकडे नेहमी बघितले ते चळवळीचे सामर्थ्य वाढविण्याचे एक साधन म्हणून, साध्य म्हणून कधीच नाही. आम्ही चळवळीसाठी निवडणुका लढविल्या; पण निवडणुकीसाठी चळवळी कधीच केल्या नाहीत. निवडणुकीच्या निकालानंतर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. आलेले अपयश धक्कादायक होते. त्याचे परखड आत्मपरीक्षण कार्यकर्त्यांसोबत दोन दिवस चिंतन शिबिर घेऊन त्यात केलेले आहेच. अपयशाची कारणमीमांसा देत बसण्यापेक्षा अपयशाचे पितृत्व स्वीकारणे मी पसंत करेन. यापूर्वी चळवळीत मिळालेल्या यशाचे, निवडणुकीतील यशाचे बहुतांश श्रेय लोकांनी मलाच दिले होते. तेव्हा अपयशाचे खापर दुसऱ्याच्या माथी मारण्याचा दांभिकपणा माझ्या हातून कधीच घडणार नाही. अपयशाने मी काही काळ खचलो होतो. कारण शेवटी मी एक सामान्य माणूसच आहे; पण निवडणुकीच्या तिसऱ्या दिवशी जयसिंगपूरच्या ऊस परिषदेतील जमलेल्या गर्दीतील चेहरे वाचल्यानंतर आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा खिन्नपणा बघून पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने लढण्याची उमेद माझ्यामध्ये निर्माण झाली.
 
एकीकडे व्यवस्था बदलण्याची आपण भाषा करावयाची, भ्रष्ट राजकारण्यांवर प्रहार करावयाचा आणि जनतेला समर्थ असा पर्याय द्यावयाचा नाही, हा ढोंगीपणा नाही का? अमूक एक नालायक आहे, हे सांगत असताना चांगला कोण आहे ते सांगण्याची जबाबदारी शेवटी आपलीच असते. ज्यावेळी दुसऱ्यावर आपण बोट रोखत असतो, तेव्हा उरलेली तीन बोटे आपल्या बाजूने रोखत असतात, हे विसरून चालणार नाही. सर्वसामान्य माणसाला ठेच लागली तरी ज्यांना वेदना होतात, ज्यांची जनतेशी नाळ जोडली आहे. मी जेव्हा विधानसभेत जनतेचे प्रश्‍न मांडत होतो, त्यावेळी मी नेहमीच एकाकी पडत होतो. शेतकऱ्यांचे प्रश्‍न विधानसभेत मांडण्यासाठी माझ्यासारखे काही आमदार निवडून यावेत, चांगली माणसे विधानसभेत जावीत, असा प्रयत्न केला. चळवळीतील कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवायची नाही तर कुणी लढवायची? जनतेच्या ठेवी ज्या बॅंका, पतसंस्थांमध्ये आहेत त्या सहकारी संस्था मोडून खाणाऱ्या पुढाऱ्यांनी, उसाच्या व दुधाच्या पैशावर राजकारणाचा नंगानाच करणाऱ्या पुढाऱ्यांनी, की शिक्षणाची दुकानदारी सुरू करणाऱ्या शिक्षणसम्राटांनी, की शासकीय सार्वजनिक जागा, भूखंड हडप करणारे, सुपाऱ्या घेऊन बदल्यांचा धंदा करणाऱ्या धंदेवाईक पुढाऱ्यांनी, की गुंडागर्दी करून सर्वसामान्यांच्या लेकीबाळींच्या अब्रूला हात घालणाऱ्या गुंडांनी निवडणुका लढवयाच्या असे अनेक प्रश्‍न मनासमोर फेर धरून नाचत असतात. आपल्यालाच का टीकेचेच लक्ष्य केले जाते? हे न समजल्यामुळे मी जेव्हा व्यथित झालेलो होतो, त्यावेळी माझ्या एका जवळच्याच सहकाऱ्याने सांगितले, “”हे बघ मित्रा, तू शेतकरी आहेस. तुला समजलं पाहिजे. शेतात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या, औत ओढणाऱ्या बैलालाच जास्त काम करण्यासाठीच आसुडाचे फटके खावे लागतात. मात्र जो बैल औत ओढता ओढता मध्येच बसतो त्याला चाबकाचे फटके मारत नाहीत, तर बश्‍या बैल म्हणून बाजार दाखविला जातो. तुला स्वतःचे व इतरांचेही शेत नांगरायचे आहे म्हणून आसुडांचे फटके खावेच लागतील. त्यात वाटेकरी मात्र मिळणार नाहीत.” म्हणून पुन्हा एकदा नव्या दमाने आणि आत्मविश्‍वासाने मी शेताची मशागत करावयाचे ठरवले आहे. लोकांचीच इच्छा नसेल तर मी थांबून जाईल. पण लोकांचीच इच्छा असेल तर शेतकऱ्यांचा आसूड खांद्यावर घेऊन नेहमीच लढत राहीन. मग मात्र त्यावेळी बरोबर किती माणसे आहेत, ५ की २५ हजार त्याचे मोजमाप करणार नाही. लढणे हाच माझा धर्म आहे आणि तोच माझा स्वखुशीने निवडलेला मार्ग आहे. पायात बळ आहे तोपर्यंत चालत राहीन. विसाव्याच्या क्षणी आपल्यासारख्यासोबत असाच संवाद साधत राहीन.

आपलाच
खासदार राजू शेट्टी.



  • प्रशांत पाटील.: जवळपास सगळ्यांच्याच मनातली गोष्ट ऊघडपणे आपण मांडली आहे.
  • sandip: Khupch chhan kavita aahet
  • dinesh chavhan: namskar, kusumagraj yanchi kavita,internet var aalyane khup aannand zala.marathi madhale abhijat sahitya netvar yave hi kalachi garaj zali aahe.tumch

प्रवर्ग